शनिवार, २६ नोव्हेंबर, २०११

काळाची किमया


माणसाचे जीवन हे गहन आहे.एक विचार केला तर अतर्क्य आहे आणि दुसरा विचार केला तर घडी दो घडीचा डाव आहे असे वाटते.काही विचारवंतांनी याला ईश्वराजवळ जाण्याची साधना म्हटले तर काहींना हे द्यूताच्या खेळाप्रमाणे भासले.आता हेच पहा ना! आपण कधी कुणावर हक्क गाजवतो,आणि कधी गुलाम म्हणून जगतो, कधी मोठा पराक्रम करून छाती फुगवतो तर कधी भित्र्या श्वापदांप्रमाणे गुहेत लपतो. आपण स्वतःला दुसर्यापेक्षा हुशार समजणारे एखाद्या सव्वाशेराला पाहून लगेच न्यूनगंड उत्पन्न करून घेतो,आपल्या मनात कधी मंद मंद समीर वाहत असतो तर कधी सगळ्यांच्या नकळत प्रलयकाळाचे वादळ माजलेले असते. आपण कधी कधी कुणावर हसतो,चिडतो.रडतो,पडतो,उठतो,घडतो..........
तरी आपल्या जीवनात आपण काही लक्षात घेत नसल्यासारखे पुढेच धावत राहतो...कुणी रागावला तरी तो कधी न कधी खुश होण्याची शक्यता संपलेली नसते..कुणी विस्कटला तरी तो ठिकाणावर येणारच असतो.पानगळ झाली तरी झाली ,वसंत येणारच आहे.आज चुका झाल्या,म्हणून उद्याही थोडेच मी चुकणार आहे ! आणि जरी चुकलो तरी मला दुरुस्त करणारा कुणीतरी आहे. होत्याचं नव्हतं आणि नव्ह्त्याच होत करणारे कुणीतरी असल्याशिवाय आपण एवढे राजरोस व स्वैरपणे भागदौड करू शकत नाहीत.रात्रंदिवस काहून मेहनत करणाऱ्याला माहित असते कि मी जरी आजारी पडलो तरी डॉक्टर आहेतच कि !
तसंच जीवनातील जखमा भरून काढणाराही एक डॉक्टर आहे ...तो म्हणजे आपला time.तो एकदा आला कि मग, काही पण होऊ शकते...आटलेल्या नदीलाही पाणी वाहते,आणि अस्ताला गेलेला सूर्यही उगवतीला येतो.हा टाईम म्हणजे काळ. काळाची करणी तो कधी विसरलाय का?जीवनातील खाचखळगे बुजवून एका level मध्ये आणणारा आणि नेहमी भविष्याची वाट दाखविणारा काळ जीवनभर प्रत्येकाची साथ सोडत नाही..कुणीतरी काळाला धन्वंतरीच म्हटले आहे.समाजातील वेदनांची तीर्वता कमी करत तो आपले काम करतच आहे.खरच काळासारखा धन्वंतरी दुसरा कोणी नाही. दुभंगलेले हृदय कसे जोडावे आणि वठलेले झाड कसे पालवावे, हे त्यालाच कळत असते.
------अरुण झिंजुर्डे----

रविवार, २२ ऑगस्ट, २०१०

आनंदीबाई जोशी


आपल्या देशातील शैक्षणिक क्षेत्रातील स्रियांची यशस्वी वाटचाल तर आपण पाहताच आहोत. आपण जर सुमारे दिड शतकापुर्विच्या परिस्थितिकडे पाहिले तर हे लक्षात येते की, त्या काळी स्रियांना शिक्षण मिळने किती कठीण होते . तरीही एक आश्चर्यकारक आणि अभिमानास्पद गोष्ट आढळून येते की, स्रीशिक्षणास नेटाने विरोध करणाऱ्या तत्कालीन समाजात हि एक तेजस्वी स्रीचरित्र असे होवून गेले कि, तिने अमेरिकेत जावून आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला.अशा या कर्तृत्ववान नाव होते आनंदीबाई जोशी.

आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी ठाण्यात झाला.आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. वयाच्या नवव्या वर्षी बालपणातच त्यांचा विवाह वयाने खुप थोरले असणार्या गोपालराव जोशी यांच्या सोबत झाला. लग्नानंतर गोपालरावानि आपल्या पत्नीचे जुने नाव यमुना हे बदलून आनंदीबाई असे ठेवले .
गोपालराव कल्याणला पोस्टल क्लर्क होते. ते स्वतः लोकहितवादी ची शतपत्रे वाचत . आपल्या पत्नीला शिक्षणात रस आहे हे गोपालरावांनी जाणले होते . लोकहितवादी च्या शतपत्रातून ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्नीस इंग्रजी शिकविण्याचा निश्चय केला. लग्नानंतर आनंदीबाईनि वयाच्या १४व्या वर्षी एका मुलास जन्म दिला. परन्तु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवल १० च दिवस जगु शकला . हीच खंत आनंदीबाईना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली . त्यांनी शिकून डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला.

गोपालरावांनी यासंदर्भात अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला. परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्त धर्म स्वीकारण्याची अट होती आणि धर्मांतर करणे तर या जोडप्यास मान्य नव्हते. मात्र त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत . पुढे आनंदीबाईची तळमळ आणि गोपालरावांची चिकाटी यांचे फलित त्यांना भेटलेच. या दोघांना अपेक्षित असेच घडले आणि आनंदीबाईना ख्रिस्त धर्म न स्वीकारता १८८३ मध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी "वुमेन्स मेडीकॅल कॉलेज ऑफ पेनसिल्वानिया" मध्ये प्रवेश मिळाला. दरम्यान, नविन वातावरण आणि प्रवासातील दगदग या मुळे आनंदीबाईची प्रकृति खुप ढासळली होती. परंतु अमेरिकेतील एका जोडप्याच्या मदतीमुळे सर्व काही पार पडत गेले .

सुरुवातीला तत्कालीन समाजाकदुन या कामाला खुप विरोध केला . आनंदीबाईनि कलकत्त्यामध्ये एक भाषण केले. तेव्हा त्यांनी भारतामधे महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे हे पटवून दिले आणि हे स्पष्ट सांगितले की, मला यासाठी धर्मांतर वगैरे करण्याची काही गरज नाहि . मी माझा हिंदू धर्म , संस्कृती यांचा कदापि त्याग करणार नाहि. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येउन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरु करायचे आहे . आनंदीबाईचे हे भाषण खुप लोकप्रिय झाले . त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून सबंध भारतातून आर्थिक मदत जमा झाली. भारताचे तत्कालीन व्हाइसरॉय यांनी पण २०० रुपयांचा फंड जाहिर केला.

कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च १८८६ मध्ये आनंदीबाईना एम डी ची पदवी मिळाली. एम् डी साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, "हिंदू आर्य लोकांमधील प्रसुतीशास्त्र" .एम् डी झाल्यावर राणी विक्टोरियाकडूनही त्यांचे अभिनन्दन झाले . हा खडतर प्रवास करताना गोपालरावांचा वृक्षासारखा आधार होता म्हणूनच आनंदीबाई ची जीवन वेली बहरत गेली.

एम् डी झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात परतल्या तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत झाले . सर्वत्र अभिनन्दन झाले. त्यांना कोल्हापूर मधील एक स्थानिक हॉस्पिटलमधील स्रीकक्षाचा ताबा देण्यात आला.

आनंदीबाईना आपले पुढील ध्येय साध्य करायचेच होते. परंतु नीयतिला हे पहायचे नसावे . त्यांना क्षयरोग झाला. पुढे काही महिन्यातच म्हणजे फेब्रु १८८७ मध्ये काळाने झड़प घातली आणि आनंदीबाईची जीवनज्योत मालवली.

केवळ २१ वर्षाच्या जीवन यात्रेत आनंदीबाईनि भारतीय स्रियासाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला. एकीकडे सावित्रीबाई व ज्योतिबा स्रीशिक्षणासाठी खस्ता खात असतानाच आनंदी-गोपाल हे जोडपे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी झटत होते . जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही मोठे काम अशक्य नाहि . समाजात राहून काम करायचे तर अड़थले येणारच . मात्र त्यावर मात करून आपले ध्येय प्राप्त करून दाखविणे यातच जीवनाची खरी सार्थकता आहे.